Wednesday, April 27, 2011

भळभळतांना जाणवले की..

भळभळतांना जाणवले की रुतले होते टोक किती
जगण्याच्या माथ्यावर पडली 'तू नसल्याची ' खोक किती..!

सुखा, तुझ्यापाठी पळतांना जाणवले नाहीच कधी,
अस्तित्वाच्या ताठ कण्याला सुटले माझ्या पोक किती !

परस्परांशी सौहार्दाचे प्रयोग रंगत गेले अन्
पडद्यामागे जाता जाता बदलत गेले लोक किती..

यंदाच्या जनगणनेमध्ये हे पण मोजून टाका की--
किती अडाणी लोक शहाणे? शिकलेले बिनडोक किती?

किती उपेक्षा केली त्याची, सदैव जे माझे होते..
कधीच माझे झाले नाही, त्याच्यासाठी शोक किती !

शिकून घ्या रे सगळे ओझे अपुले आपण पेलाया
खुशाल टाका मान, असे उरले खांदे निर्धोक किती??

No comments:

Post a Comment